कलिंगड पिकावर येणारे मुख्य रोग। कलिंगड शेती । बुरशीजन्य रोग

 कलिंगड पिकावर येणारे मुख्य रोग

कलिंगड, खरबूज, काकडी ही पिके कीड व रोगास फारच संवेदनशील आहेत. या पिकांवर भुरी, केवडा व मर हे रोग आणि नागअळी, फुलकिडे व फळमाशी या किडींचे वेळीच नियंत्रण आवश्यक आहे. फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.

*मर*

15-21 दिवसांनंतर - या रोगाचे दोन प्रकार आहेत. एक बुरशीमुळे होणारी फ्युजारियम मर व दुसरा जिवाणुमुळे होणारी मर. फ्युजारियम मर या रोगाचा प्रादुर्भाव केवळ कलिंगडामध्येच होतो. तर जिवाणूजन्य मरचा प्रादुर्भाव काकडी व खरबुजामध्ये जास्त दिसून येतो. फ्युजारियम मर या रोगग्रस्त खोडाचा मधोमध उभा काप घेतल्यास खोडाच्या लांबीला समांतर तपकिरी रंगाची रेष (उतीचा थर) दिसते. लागवडीनंतर 21-25 दिवसांनी वेलाची एक बाजू वाळते व संपूर्ण पीक नाहीसे होऊ शकते. जिवाणूजन्य मर रोगग्रस्त खोडातून दुधासारखा चिकट द्रव स्रवतो.


*केवडा*

दमट हवामानात केव्हाही - हा सुद्धा बुरशीजन्य रोग असून खूपच हानिकारक आहे. दमट हवामानात याची लागण व वाढ खूप जोमाने होते. पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यावर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके ठराविक आकारापेक्षा जास्त वाढत नाही. परंतु मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरतात. यामुळे पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.


*भुरी*

40-50 दिवसांनंतर - हा बुरशीजन्य रोग असून केवड्याप्रमाणे हाही खूपच नुकसानकारक आहे. यामध्ये पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरीसारखे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात.

फवारणी (लागवडीनंतर 25 दिवसांनी )

*एकात्मिक व्यवस्थापन:-*

* मागील पिकांचे अवशेष नष्ट करावेत व पिकांची फेरपालट करावी.

* पीक नेहमी तणमुक्त ठेवावे.

* रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.

* पूर्वी जर हे पीक मर रोगास बळी पडले असेल तर त्या जमिनीत पुढील पाच वर्षे हे पीक घेऊ नये.

* पिकांवरील नुकसानीची लक्षणे लक्षात घेऊन कोणती कीड वा रोग आहे याची खात्री तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्यावी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाचे उपाय योजावेत.

* या पिकांवर करपा, विषाणूजन्य रोग तर नागअळी, पट्टेदार भुंगे यांचाही प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार होतो. त्यांचाही अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय योजावेत.

प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी पुढे जात असल्यास रासायनिक उपाय अमलात आणावेत.

मर रोगाच्या नियंत्रणासाठी- कॉपर ऑक्झिक्लोराईड (50 टक्के ईसी) 2.5 ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे.

https://www.facebook.com/groups/522198518657687/permalink/708800523330818/?sfnsn=wiwspmo

चौथी फवारणी (लागवडीनंतर 35 दिवसांनी) प्रति लिटर पाण्यासाठी मात्रा

केवडा रोग- मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम किंवा झायनेब (72 टक्के डब्ल्यूपी) 4 ग्रॅम.


पाचवी फवारणी (लागवडीनंतर 45 दिवसांनी) प्रति लिटर पाण्यासाठी मात्रा

भुरीच्या नियंत्रणासाठी- प्रोपिनेब (70 टक्के डब्ल्यूपी) 1.5 ग्रॅम मि.लि. किंवा

पेनकोनॅझोल (10 टक्के ईसी) 1 मि.लि.(तज्ञांच्या सल्ल्याने फवारण्या घ्याव्यात,कोणत्या रोगासाठी कोणते उपाय असतात यासाठी ही माहिती आहे.)

कलिंगडमध्ये विषाणूजन्य व जीवणूजन्य रोग सुद्धा येतात पण त्यांचे प्रमाण खुप कमी असते,हे रोग आल्यास पहिले लक्षण पानांवर दिसते पाने आकडून जातात,उन्हाच्या तडाख्यात थोडी सोकतात, पुन्हा ऊन कमी झाल्यानंतर पूर्ववत होतात.

स्रोत:ऍग्रोवन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean