ऊसाचे पाचट । शेतामध्येच कुजवल्यास मिळणारे फायदे । Sugarcane Farming

 


ऊसाचे पाचट जाळणे ही जरी वेळ वाचवणारी पद्धत वाटत असली, तरी ती शेतीसाठी 'स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी' आहे. पाचट जाळल्यामुळे होणारे नुकसान केवळ जमिनीपुरते मर्यादित नसून त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. पण हेच पाचट आपण जाळण्या ऐवजी शेतामध्ये कुजवल्यास भरपूर असे फायदे मिळू शकतात. 

पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:-

१.जमिनीतील मित्रजीवांचा नाश:- जमिनीचा सुपीकपणा टिकवून ठेवणारे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आगीच्या उष्णतेमुळे नष्ट होतात.

*जमिनीला जिवंत ठेवणारे गांडूळ उष्णतेमुळे मरतात किंवा जमिनीच्या खूप खोलवर जातात, ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.

२.अन्नद्रव्यांचा ऱ्हास:- पाचट जाळल्यामुळे त्यातील नत्र (Nitrogen) पूर्णपणे हवेत उडून जातो.

* इतर घटक: स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये राखेच्या स्वरूपात उरतात खरी, पण ती वाऱ्याने उडून जातात किंवा पाण्यासोबत वाहून जातात. एक टन पाचट जाळल्यामुळे जमिनीचे सुमारे ५ ते ६ किलो नत्र, १ ते २ किलो स्फुरद आणि ८ ते १० किलो पालाश यांचे नुकसान होते.

३.सेंद्रिय कर्बाचे नुकसान:- सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा कणा आहे. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटते. सेंद्रिय कर्ब कमी झाला की जमिनीची उत्पादन क्षमता कमालीची घटते.

४.जमिनीच्या भौतिक रचनेवर परिणाम:- सतत पाचट जाळल्यामुळे जमिनीचा वरचा थर कडक होतो. यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते.

*जमिनीवर आच्छादन नसल्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडतो आणि ओलावा वेगाने उडून जातो, ज्यामुळे पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते.

५.पर्यावरणीय आणि आरोग्य समस्या:- पाचट पेटवल्यामुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि धूर मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतो. तसेच ग्लोबल वॉर्मिंग परिणाम म्हणजेच शेतातील आग वातावरणातील तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरते.

६.खोडवा पिकाचे नुकसान:- अनेक शेतकरी खोडवा घेण्यासाठी पाचट जाळतात, पण उष्णतेमुळे ऊसाच्या ठोंबांना (Buds) इजा पोहोचते. यामुळे खोडव्याची फूट कमी होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते.

नोट:- पाचट जाळल्याने जमिनीचे तापमान ४०°C ते ६०°C पर्यंत वाढते, जे जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. 


पाचट न जाळता ते शेतातच कुजवणे ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. पाचटात कार्बन जास्त असतो, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या कुजायला वेळ लागतो. ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी काही सोप्या पद्धती:-

१.पाचट समप्रमाणात पसरवणे: ऊसाची तोडणी झाल्यानंतर शेतात पडलेले पाचट दोन ओळींच्या मध्ये समप्रमाणात पसरवून घ्या. पाचट जास्त मोठे असल्यास 'ट्रॅश कटर' च्या सहाय्याने त्याचे बारीक तुकडे केल्यास कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते.

२.खतांचा डोस (C:N Ratio संतुलित करणे): पाचटामध्ये कार्बन जास्त आणि नत्र कमी असतो. तो कुजवण्यासाठी जिवाणूंना नत्राची गरज असते. त्यासाठी प्रति एकरी खालीलप्रमाणे खते टाका:

युरिया: ८० ते १०० किलो (नत्रासाठी), सिंगल सुपर फॉस्फेट: ५० ते १०० किलो (स्फुरदामुळे कुजण्याची प्रक्रिया सुधारते)

३.पाचट कुजवणारे जिवाणू (Decomposing Culture): बाजारात पाचट कुजवणारे खास जिवाणू संच मिळतात (उदा. डिकंपोजिंग कल्चर).

वापर: १ ते २ किलो (किंवा लिटर) जिवाणू संच शेणखतात किंवा पाण्यात मिसळून पाचटावर शिंपडावा.

४.ओलावा टिकवून ठेवणे: कुजण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ओलाव्यावर अवलंबून असते. पाचटावर खते आणि जिवाणू टाकल्यानंतर हलके पाणी द्यावे. जमिनीमध्ये वाफसा (ओलावा) कायम राहील याची काळजी घ्यावी.


पाचट कुजवल्यामुळे होणारे मुख्य फायदे:-

१.जमिनीच्या सुपीकतेत वाढ:-

*पाचट कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा 'आत्मा' मानला जातो.

*पाचटामधून पिकाला आवश्यक असणारे नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये नैसर्गिक स्वरूपात पुन्हा जमिनीला मिळतात.

*पाचटामुळे जमीन भुसभुसित होते, ज्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि जमिनीत हवा खेळती राहते.

२.पाणी व्यवस्थापन आणि ओलावा:-

*बाष्पीभवन कमी होते: पाचटाचे आच्छादन (Mulching) जमिनीवर असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेने होणारे पाण्याचे बाष्पीभवन थांबते.

*ओलावा टिकून राहतो: यामुळे पिकाला पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर वाढवता येते. म्हणजेच कमी पाण्यातही ऊस जोमाने वाढतो.

३.उपयुक्त सूक्ष्मजीव आणि मित्रकीटक:-

*जिवाणूंची वाढ: पाचट कुजण्याच्या प्रक्रियेत जमिनीतील फायदेशीर जिवाणू आणि गांडुळांची संख्या झपाट्याने वाढते.

*मित्रकीटकांचे रक्षण: पाचट जाळल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील मित्रकीटक मरतात, पण पाचट ठेवल्यास त्यांचे संवर्धन होते.

४.आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे:-

*खतांच्या खर्चात बचत: पाचट कुजल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढते, परिणामी रासायनिक खतांचा खर्च २०% ते २५% पर्यंत कमी होऊ शकतो.

*तण नियंत्रण: पाचटाचे जाड आच्छादन असल्यामुळे शेतात तण कमी उगवते, ज्यामुळे निंदणीचा खर्च वाचतो.

*प्रदूषण रोखणे: पाचट जाळल्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण टाळले जाते आणि कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते.

एवढे फायदे जर पाचट शेतामध्ये ठेवून कुजवले तर शेतकऱ्याला मिळू शकतात. त्यामुळे ऊसाचे पाचट जळताना एकदा नक्की विचार करा. 

स्रोत-इंटरनेट

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

महादेव निगडे, दौंड पुणे 

शरद बोन्डे , अचलपूर अमरावती

सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतुळ अकोले अहिल्यानगर 

ऋषिकेश कदम 

उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #sugarcane #wastage #fireloss #decomposingwastage # benifits #smartfarming 


टिप्पण्या

  1. जमिनीचे आरोग्यपाचट कुजवल्याने सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात, ज्यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि गांडूळ व सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.�� यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पुढील पिकांचे उत्पादन चांगले मिळते.�पाण्याची बचतपाचटाचे आच्छादन जमिनीचा ओलावा टिकवते आणि बाष्पीभवन रोखते, ज्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची बचत होते.�� तणांचे नियंत्रणही होते, ज्यामुळे मशागतीचा खर्च ५० टक्के कमी होतो.�पर्यावरण संरक्षणपाचट जाळण्याऐवजी कुजवल्याने प्रदूषण टाळले जाते आणि वातावरण स्वच्छ राहते.�� याशिवाय, एकात्मिक कीड व्यवस्थापनाला मदत होते.�

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest